नवी मुंबई : उरणच्या जेएनपीटी बंदरात कंटेनर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एकाला अटक करण्यात आली आहे. तर 1 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


इंडोनेशियातून पॉलिकॅब वायर्स कंपनीनं 24 मे रोजी कॉपर ऍनालेंड वायर आयात केली होती. जेएनपीटी बंदरात हा माल उतरवल्यानंतर एका कंटेनरमधून तो गुजरातमध्ये नेला जात होता. यावेळी कंटेनरचालकानं आपल्या दोन साथीदारांसह कंपनीच्या गार्डला मारहाण करत हा कंटेनर पळवला.

याप्रकरणी उरण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस तपासात हा माल धुळे, अहमदनगरमध्ये लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अहमदनगरहून रंजितसिंग आनंद या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून कंटेनर आणि वायर असा एक कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, यातील मुख्य आरोपी ओमप्रकाश राजभर आणि त्याचे इतर साथीदार अद्याप फरार आहेत. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या नावावर नवी मुंबईसह मुंबई, गुजरात, दिल्ली येथे देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबई पोलीस या आरोपींचा कसून शोध घेत आहेत.