मुंबई : काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्यापाठोपाठ त्यांच्या कुटुंबियांनाही मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कृपाशंकर सिंह यांच्या पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्रमोहन, मुलगी सुनिता, जावई विजय सिंह आणि सून अंकिता या सर्वांना एसीबी कोर्टानं क्लीन चीट दिली.


काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांना याआधीच एसीबीच्या केसमधून मुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांविरोधातही खटला दाखल होत नाही, असा निर्वाळा न्यायालयानं दिला आहे.

कोणत्याही लोकनेत्या विरोधात खटला चालवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. मात्र या प्रकरणात ती घेण्यात आली नसल्यानं कृपाशंकरसिंह यांच्याविरोधात खटला चालवताच येणार नसल्याचं त्यांच्यावतीनं एसीबी कोर्टात सांगण्यात आलं आहे.

आरोपपत्रानुसार कृपाशंकर यांच्याविरोधात कोणतेही सबळ पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरली. त्यामुळे कृपाशंकरसिंह यांना त्यांच्याविरोधात लाचलुचपत विभागामार्फत दाखल झालेल्या खटल्यातून दिलासा मिळाला.

आपल्या मिळकती पेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या आरोपात एसीबीनं कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.