मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री वर फोनवरुन अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक खेरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक कसून तपास करत आहेत. यासोबतच या प्रकरणाची माहिती सायबर पोलिसांना देखील देण्यात आली आहे. हा कॉल नक्की दुबईवरून आला होता का? की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कोणी खोडसाळपणा तर केला नाही ना? याची देखील माहिती घेण्यात येतं आहे.


मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्री परिसरात आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यामध्ये जलद कृती दलाच्या जवानांचे एक पथक आणि त्यांची मोबाईल व्हॅन देखील दाखल झाली आहे. यामध्ये 6 कमांडो आणि एका अधिकाऱ्याचा सामावेश आहे. या जवानांचे विशेष म्हणजे हे जवान अत्याधुनिक शस्त्रास्त्रासह सज्ज आहेत. यासाठी त्यांना विशेष ट्रेनिंग देखील देण्यात आले आहेत.


मातोश्री निवासस्थान हे शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान : गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई
याबाबत बोलताना गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, या प्रकाराची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. मातोश्री निवासस्थान हे शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान आहे आणि या निवासस्थानाकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असे मी एक शिवसैनिक म्हणून बजावून सांगतो. या कॉलचा लवकरच छडा लावला जाईल व कॉल करणाऱ्याला धडा शिकवला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.


 मातोश्री वर निनावी फोन आला होता, मात्र... मंत्री अनिल परब यांची 'त्या' फोनबद्दल माहिती


मातोश्री उडवण्याबाबत धमकी दिलेली नाही : परिवहन मंत्री अनिल परब
परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, मातोश्रीवर एक निनावी फोन आला होता. दाऊद गँगचा हस्तक असल्याचं त्यानं सांगितलं. त्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं. मातोश्री उडवण्याबाबत धमकी दिलेली नाही. या कॉल बाबत पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेबाबत सतत आढावा घेतला जातो आहे.


गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून तपासाचे आदेश
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याच्या निनावी धमकीबद्धल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच या कृतीचा तीव्र निषेधही करण्यात आला. सदरहू प्रकरण खूप गंभीर असून केंद्र सरकारने देखील याची तातडीने दखल घ्यावी व यामागे जे कुणी असतील त्यांना शोधून त्यांना कठोर शासन करावे, अशा तीव्र भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केल्या आहेत. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला आहे अशी देखील माहिती दिली.


Anil Parab | मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीच्या फोनबाबत चौकशी सुरू, धमक्या देणाऱ्यांना सरकार सोडणार नाही - अनिल परब