मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस लिखित 'अर्थसंकल्प - सोप्या भाषेत' या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा आज विधिमंडळाच्या सेन्ट्रल हॉलमध्ये पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विधाससभा अध्यक्ष नाना पटोले, सभापती रामराजे निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री अनिल परब आणि भाजप आमदार चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमानिमित्त सत्ताधारी-विरोधक आज एकाच मंचावर आले. त्यामुळे या दिग्गजांनी एकमेकांना टोले आणि टोमणे मारले नसते तरच नवल. विशेष म्हणजे राज्यात रंगलेल्या सत्ता नाट्यानंतर देवेंद्र फडणवीसांची फिरकी घेण्याची एकही संधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सोडली नाही.


काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांचा भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांना टोमणा मारला. ते म्हणाले की, मला कधी वाटलं नव्हतं की मला या ठिकाणी या विषयी बोलावं लागेल, पण आज माझ्यावर ही वेळ तुम्हीच आणली. खरंतर हे पुस्तक त्यांनी माझ्यासाठीच लिहिलं आहे याची मला खात्री आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस म्हणाले आज या कार्यक्रमात ते स्वतः पाहुणे आहेत, खरं म्हणजे दुसऱ्याच्या खर्चात आपला कार्यक्रम कसा करून घ्यावा हे तुमच्याकडून शिकावं, असाही टोलाही त्यांनी लगावला. पुढचे पाच वर्षे अशीच पुस्तकं लिहीत चला, म्हणजे आम्हाला तुमचं मार्गदर्शन असंच लाभत राहील, असेही ते म्हणाले.



अजित दादा आणि माझी आत्ताच मैत्री झालीय, पण दादांनी मी माझ्या जुन्या मित्राची स्तुती करतोय याकडे जास्त लक्ष देऊ नये, असं देखील ठाकरे म्हणाले. ज्या जनतेच्या खिशातून पैसा जातो त्याच्या खिशात पैसा कसा येईल याचा विचार केला जावा, असं ते म्हणाले. अर्थकारणावर परिणाम करणारी प्रत्येक गोष्ट अर्थसंकल्पात असायला हवा. मात्र नोटबंदी हा विषय अर्थसंकल्पात यायला हवा होता की नव्हता? हा मला पडलेला प्रश्न आहे, असं म्हणत ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मराठीत अशा पद्धतीचं पहिलं पुस्तक लिहिलं गेलं असावं, असं म्हणत मीच पहिल्यांदा हे पुस्तक वाचणार आहे, असंही ठाकरे म्हणाले.

आपण जो अर्थसंकल्प मांडतो, तो सगळा पैसा सर्वसामान्यांचा असतो. सर्वसामान्याला कळलं पाहिजे माझ्या पैशाचा वापर कसा करत आहात. मी कर भरतोय त्याचा माझ्यासाठी काय उपयोग केला जात आहे. काय कमी होणार, वाढणार आहे हे सर्वसामान्यांना कळलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.