CM Eknath Shinde : मुंबईतील स्वच्छता पॅटर्न (Mumbai cleanliness pattern ) चांदा ते बांदा असा संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जाईल असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केलं. या माध्यमातून स्वच्छ, सुंदर महाराष्ट्र घडवू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. स्वच्छता कर्मचारी हेच मुंबईचे खरे हिरो असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन तत्पर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महा स्वच्छता अभियानाला प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथून महा स्वच्छता अभियानास प्रारंभ झाला.


मुंबई पालिकेच्या वतीनं सुरू करण्यात आलेले स्वच्छता अभियान आता केवळ मुख्यमंत्री किंवा महानगरपालिकेच्या संकल्पनेतून सुरु असलेले अभियान राहिलेले नसून त्याने लोकचळवळीचे रुप धारण केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार  सदा सरवणकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे,  अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उद्योजक नादिर गोदरेज, माजी आमदार राज पुरोहित, उप आयुक्त (विशेष) श्री. संजोग कबरे याच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.   


 संपूर्ण मुंबई महानगरात स्वच्छता मोहीम


बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक 3 डिसेंबर 2023 पासून मुंबई महानगरात संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) मोहीम हाती घेतली आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणून आज मुंबईत दहा ठिकाणी महा स्वच्छता अभियान राबवण्यात आले. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी स्वच्छता, संयंत्रांच्या सहाय्याने स्वच्छतेची प्रात्यक्षिके आणि स्थानिक लोकसहभाग असे सर्व मिळून ही महा स्वच्छता करण्यात आली.  


 एकूण दहा ठिकाणी महा स्वच्छता अभियान


भारताचे प्रवेशद्वार व्यतिरिक्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यान प्राणिसंग्रहालय, भायखळा; सदाकांत ढवन मैदान, नायगाव; वांद्रे रेल्वे स्थानक पश्चिम; वेसावे (वर्सोवा) चौपाटी; गणेश घाट, गोरेगाव पूर्व; स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडांगण, कुर्ला पूर्व; अमरनाथ पाटील उद्यान, गोवंडी पूर्व; हिरानंदानी संकूल, पवई; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ड्रीम पार्क, ठाकूर गाव, कांदिवली पूर्व अशा एकूण दहा ठिकाणी महा स्वच्छता अभियान पार पडले.  या महा स्वच्छता अभियानाचा मुख्य कार्यक्रम भारताचे प्रवेशद्वार येथे पार पडला. येथूनच उर्वरित नऊ ठिकाणी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. तसेच या नऊ ठिकाणचे लोकप्रतिधी तसेच नागरिकांशी मुख्यमंत्री महोदयांनी थेट संवादही साधला.


मुंबईतील स्वच्छतेची चळवळ विस्तारणार


मुंबईतील वेगवेगळ्या कारणांनी वाढणारे एकूणच प्रदूषण लक्षात घेता मुळापासून कार्यवाही करण्याचा निश्चय केला आहे. त्यातून संपूर्ण स्वच्छता अभियानाची संकल्पना सुचली. विविध विभागातील मनुष्यबळ, यंत्रसामुग्री एका विभागात एकत्र आणून एकाचवेळी संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला रस्ते स्वच्छ करणे, त्यानंतर ब्रशच्या धूळ हटवून जेट स्प्रेद्वारा संपूर्ण रस्ते पाण्याने धुवून काढणे; गटारे व नाल्यांचे प्रवाह कचरा मुक्त ठेवणे,  सार्वजनिक प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण, अनधिकृत फलक काढणे अशी एक ना अनेकांगी कार्यवाही हाती घेतली. रस्ते धुण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जात आहे. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकामांची ठिकाणे आच्छादित करण्यात आली आहेत. धूळ नियंत्रण संयत्रे लावणे अनिवार्य केले आहे. या सर्वांचे दृश्य परिणाम म्हणून मुंबई स्वच्छ दिसू लागली आहे. मुंबईतील स्वच्छतेची चळवळ विस्तारुन आता हे अभियान चांद्यापासून बांद्यापर्यंत राबवत संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ करायचा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


उपलब्ध मोकळ्या सार्वजनिक जागांवर झाडे लावण्याचे निर्देश 


काही दिवसांपूर्वी मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावरील पदपथ दिसेनासे झाले होते. आता ते संपूर्ण स्वच्छ करण्यात आले असून त्या ठिकाणी 'ग्रीन कॉरिडॉर' बनवले जाईल. जेणेकरुन नागरिकांना त्यावरुन सुखद अनुभवासह फिरता येईल.  मुंबईत हरित आच्छादन (ग्रीन कव्हर) वाढवण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उपलब्ध मोकळ्या सार्वजनिक जागांवर झाडे लावण्याचे निर्देश दिले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीलगत ठाणे भागात 27 किलोमीटरचा वनपट्टा तयार करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत. त्यादिशेने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन उत्तम कामगिरी करत आहे, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी काढले. 


महाराष्ट्र हे भारताचे विकासाचे इंजिन


प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला गती दिली आहे आणि महाराष्ट्र हे भारताचे विकासाचे इंजिन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या स्वच्छता अभियानालाही वेगळे महत्व आहे. राज्यातील सार्वजनिक स्वच्छतेची स्थिती सुधारण्यासाठी मुंबईतील स्वच्छतेचा पॅटर्न राज्यभर विस्तारण्यात येणार आहे. एवढेच नाही तर हा पॅटर्न संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल, असा आशावादही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी व्यक्त केला. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासोबतच शक्य तेथे पर्यावरणपूरकता जपा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष आणि दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 


 महत्त्वाच्या बातम्या:


CM Eknath Shinde : महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टचं सांगितलं