मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली त्या प्रकरणावरून राज्यामध्ये संतापाची लाट अजूनही कायम असल्याचं दिसून येत आहे. राज्यात महाविकास आघाडीने आज जोडे मारो आंदोलन केलं आहे. मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळाली नसतानाही आज (1 सप्टेंबर) महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मुंबईमधील हुतात्मा चौकात पोहोचले. कोणत्याही परिस्थितीत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा काढला, यावेळी महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते देखील उपस्थित होते. यादरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी बोलताना वादग्रस्त केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याविरोधात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत, असं खैरे यांनी म्हटलं आहे, तर त्यांच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं आहे. 


काय म्हणालेत चंद्रकांत खैरे?


कोणत्याही गावात कोणताही पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा असो किंवा मग तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असो, त्या पुतळ्यांना वेगळ्या संदेश रूपाने काही केलं तर दंगली होतात, आज इतका मोठा पुतळा पडला, मला समजत नाही,  महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत, झाल्या पाहिजेत. आज आम्ही महाविकास आघाडी मिळून जोडो मारो आंदोलन करत आहोत, पोलिस येऊ द्यात आता 40 वर्षांत आम्हाला सवय झाली आहे, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केलं आहे, तर त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं आहे. 


काय म्हणाले एकनाथ शिंदे?


लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती, मोठमोठे नेते दंगलीची भाषा करत होते, त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे, त्यांना महाराष्ट्र शांत नकोय, राज्यात दंगली व्हाव्या, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी, असा प्रयत्न लोकसभेपूर्वी देखील झाला आहे. मात्र, राज्यातील जनता सुज्ञ आहे, संयमी आहे, म्हणून राज्य सरकार देखील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत असल्याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खैरेंना दिलं आहे. 


महाविकास आघाडीने आज जोडे मारो आंदोलन


ज्यात महाविकास आघाडीने आज जोडे मारो आंदोलन केलं आहे. मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळाली नसतानाही आज (1 सप्टेंबर) महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मुंबईमधील हुतात्मा चौकात पोहोचले. कोणत्याही परिस्थितीत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा काढला. या मोर्चासाठी राज्यभरातील महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार आदित्य  ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यासह अनेक नेते आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.