मुंबई : बेताल बादशाह राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी एबीपी माझाच्या कार्यालयात फोन करुन महिला प्रतिनिधींशी अर्वाच्य भाषेत वाद घातला. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.


मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलिसांना याबाबत चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे.

मुली पळवण्याची भाषा करणाऱ्या राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी आता मुजोरी सुरु केली आहे. आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्यावर 'माझा विशेष' कार्यक्रमात चर्चा झाली. ज्यात मनसेकडून अविनाश अभ्यंकर सहभागी झाले होते. राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी अभ्यंकर यांच्या वक्तव्याची मोडतोड करुन, त्यांनी शिवीगाळ केल्याचा खोटा प्रचार सुरु केला आहे.

हे कार्यकर्ते इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी एबीपी माझाच्या कार्यालयात फोन करुन महिला प्रतिनिधींसोबत अर्वाच्च भाषेत वाद घातला. त्यामुळे बेताल बादशाहच्या आदेशावरुनच मुजोर कार्यकर्ते दडपशाही आणि दमदाटीची भाषा करतायत का? हा प्रश्न आहे.