मुंबई: महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर तिखट शब्दात हल्लाबोल केला. 'पारदर्शकतेचा विषय मांडला म्हणून युती तोडली.  मुंबईला लुटणाऱ्यांचा धंदा बंद करा, महापालिकेच्या जीवावर माझा पक्ष चालत नाही.' असं फडणवीसांनी म्हटलं. तसंच शिवसेनेच्या सभेत मावळे आणि कावळे असल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली. ते मुंबईतील सभेत बोलत होते.


‘तुमचा पंजा काय असतो ते मी कडोंमपा निवडणुकीत दाखवून दिलं’

‘मी वाघ नाही, पण सामान्य माणूस आहे. वाघ नरेंद्र मोदी आहेत. तुमचा पंजा काय असतो ते मी कडोंमपा निवडणुकीत दाखवून दिलं आहे. लक्षात ठेवा माझे कुलदैवत नरसिंह आहे. त्यामुळे तुम्ही मला घाबरवू शकत नाही. मी भ्रष्टाचाऱ्यांचा फडशा पडल्याशिवाय रहाणार नाही. मी वर्षा बंगल्यावर परिवर्तन करायला आलो नाही, मुंबईत परिवर्तन करायला आलो आहे. आशीर्वाद द्या, बहुमत द्या.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

‘सगळीकडे एकच... कमळ, कमळ आणि कमळ!’

‘मी महाराष्ट्रात दौरा केला सगळीकडे एकच कमळ, कमळ, कमळ. काळजी करायचं कारण नाही. जनतेने लोकसभेत, विधानसभेत नंबर 1 केलं, नगरपालिकेत नंबर 1 केलं आता जिल्हा परिषद आणि महापालिकेतही नंबर 1 होऊ.’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

‘पुण्यात सभा होती 4 वा. पण छापलं दोन वाजता.’                

‘एका सभेला गेलो. सभा होती 4 वाजता. पण छापलं दोन वाजता. त्यामुळे गोंधळ झाला. त्यामुळे काही लोकांना उकळ्या फुटल्या. सभेचं जाऊ द्या पण लोकांनी तुम्हाला रद्द करायचं ठरवलं आहे.’ असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलं.

‘मुंबईला लुटण्याचा धंदा बंद झाला पाहिजे’

‘मुंबईला लुटण्याचा धंदा बंद झाला पाहिजे. पारदर्शकता विषय मांडला आणि म्हणून  त्यांनी युती तोडली. पण महापालिकेच्या जीवावर मी माझा पक्ष चालवत नाही. ज्यांना पक्ष चालवायचा त्यांना पारदर्शकता मान्य नव्हती. मुजोरी किती अजूनही केंद्राचा अहवाल दाखवतात. उद्धवजींनी स्वतः तो अहवाल वाचला आहे का? वाचला असता तर तो गुंडाळून ठेवला असता.’ अशी टीका मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर केली.

‘राजा सगळे किल्ले हरतो तेव्हा त्याची बालेकिल्ल्यात लपतो’

‘इथे राहणाऱ्या मुंबईकरांवर अन्याय होऊ देणार नाही. गुजराती समाजबद्दल अग्रलेख लिहता. लाज वाटली पाहिजे कसं काय टार्गेट करता त्यांना?  भावनात्मक मुद्दे संपले. राजा सगळे किल्ले हरतो तेव्हा त्याची लपायची जागा बालेकिल्ला असते.’ असा निशाणा मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर साधला.

'विकास मोदीजी आणि फडणवीसच करतील. बाकीच्यांनी फक्त भाषणंच करावीत‬. २४४५ कोटींचे रस्ते कसे झाले? वरून गुळगुळीत आणि आतून पोकळ! नालेसफाई कितीची? ८०००कोटींची! नाही जनाची तर मनाची ठेवा.' अशी टीका मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर केली.


'एसआरए ही बिल्डरांची योजना नाही, ती सर्वसामान्यांची योजना आहे मेट्रोचे जाळे निर्माण करीत आहोत. एका तिकिटात संपूर्ण प्रवास करता येईल. अशी व्यवस्था करतो आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प करु. कोळीवाड्याचा विकास करू. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करतो आहे.' असं सांगत मुख्यमंत्र्यांनी मतदारांना भाजपला मत देण्याचं आवाहन केलं.

संबंधित बातम्या:

'मग युतीसाठी का आला होतात?' उद्धव यांचा राज ठाकरेंना सवाल

‘राज ठाकरेंनी 5 वर्षात फक्त नकलाच केल्या’, नाशकात मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी

चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे, हे त्यांनी ध्यानात ठेवावं: अजित पवार

मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळी शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी

आम्ही केलेल्या विकासकामांचं प्रेझेंटेशन राज ठाकरेंनी केलं: गिरीश महाजन

मुख्यमंत्र्यांच्या रद्द सभेवरुन शिवसेनेचे तिरकस बाण

शरद पवार बेभरवशी : शिवसेना

सभेला कोणीच नाही, सभा सोडून मुख्यमंत्री रवाना! 

माझ्या पक्षाचं मी बघून घेईन : राज ठाकरे