मुंबई : राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत हळूहळू अनेक गोष्टी सुरु करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.


कोविड - 19 मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद आहेत. याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वासत केले.


थिएटर सुरु करण्याबाबत सकारात्मक, लवकरच चित्र स्पष्ट होईल : अमित देशमुख


मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राज्यातील कोविड -19 चे संकट मोठे असून या संकटकाळात सिनेमागृहांचे मालक शासनासोबत आहेत याचे समाधान आहे. राज्यातील सिनेमागृहांबाबतही सकारात्मकता ठेवून निश्चित करण्यात आलेल्या एसओपीनुसार सिनेमागृहे सुरु करण्यात येतील. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरू करत आहोत. मनोरंजन क्षेत्र हे राज्याच्या अर्थचक्राला गती देणारे क्षेत्र आहे. हे क्षेत्र बंद ठेवण्यात आपल्याला किंवा शासनाला आनंद नाही.


आपल्याला जगभरात काही देशांमध्ये कोविड -19 चा संसर्ग वाढल्याने युरोप, ऑस्ट्रेलिया, स्वीडन यासारख्या ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करावा लागला. हिवाळ्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू शकतो असा इशारा देण्यात आल्याने आपल्याला काळजीपूर्वक पुढे जायचे आहे. महाराष्ट्रात आपण अनलॉक टप्प्याटप्प्याने करण्यामागे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये हाच उद्देश आहे. सिनेमागृहांमध्ये वातानुकुलित वातावरण प्रेक्षक सिनेमा पहायला आल्यानंतर किमान दोन तास बंदिस्त ठिकाणी असतो त्यावेळी त्याला संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमधील स्वच्छता पाळली जाणे, सिनेमागृहे वेळोवेळी सॅनिटाईज करण्यात येणे,सिनेमागृहात एकूण आसनक्षमतेच्या फक्त 50 टक्के प्रेक्षक असणे या बाबी पाळल्या जाणे गरजेचे आहे. एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, प्रेक्षकांनी मास्क लावणे, सॅनिटाईज करणे आणि शारीरिक अंतर पाळणे हे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


Cinema halls reopening | स्पेशल रिपोर्ट | चित्रपटगृह पुन्हा सुरु झाल्यानंतर कशी काळजी घेतली जाणार?