पाणी समजून रॉकेल प्यायल्याने अंबरनाथमध्ये चिमुकल्याचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 12 Nov 2018 08:05 PM (IST)
कार्तिक दिवाळीनिमित्त पुण्याहून अंबरनाथला मामाकडे आला होता. घरात खेळत असताना त्याने पाणी समजून रॉकेल प्यायलं.
कल्याण : पाणी समजून रॉकेल प्यायल्याने अवघ्या एक वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथमध्ये ही घटना घडली असून पालकांनी मात्र डॉक्टरवरच हलगर्जीचा आरोप लावला आहे. कार्तिक सोनावणे या एक वर्षांच्या चिमुकल्याला या दुर्घटनेत प्राण गमवावे लागले. कार्तिक दिवाळीनिमित्त पुण्याहून अंबरनाथला मामाकडे आला होता. घरात खेळत असताना त्याने पाणी समजून रॉकेल प्यायलं. ही बाब लक्षात येताच मामाच्या कुटुंबीयांनी कार्तिकला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारांदरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. कार्तिकचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. डॉक्टरांनी आपल्या बाळावर नीट उपचार न केल्यामुळे त्याचा मृत्यू ओढावल्याचं कार्तिकच्या आजीचं म्हणणं आहे. डॉक्टरांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.