कल्याण : दोन वर्षांपूर्वी झालेल्या नेवाळी आंदोलनात अनेक शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.


कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आगरी कोळी महोत्सवाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना ज्याप्रमाणे मराठा आंदोलन आणि भीमा कोरेगाव प्रकरणातले गुन्हे मागे घेण्यात आले, तसेच नेवाळी आंदोलनातील गुन्हेही मागे घेण्याची मागणी आगरी समाजाच्या वतीने करण्यात आली.

याला उत्तर देताना याबाबतीत सकारात्मक  विचार करून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल आणि निष्पाप लोकांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या कार्यक्रमापूर्वी सीएम चषक स्पर्धेच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आंबिवलीत मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. यावेळी एनआरसी कंपनीच्या कामगारांनी आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. त्यावर त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

कल्याण : नेवाळी विमातळ प्रकरण नेमकं काय आहे?


नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादित केल्याच्या विरोधात नाका परिसरकार शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन केले होते. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवर डावलपाडा गावाजवळ पोलिसांच्या गाड्या पेटवल्या होत्या. आपल्याच मालकीच्या शेतजमिनींवर पेरणी करण्यास मज्जाव केल्याने शेतकरी संतप्त झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कल्याण-मलंगगड रस्ता रोखून धरला होता. शिवाय टायर जाळून मलंगगडाकडे जाणारा मुख्य रस्ता बंद करत पोलिसांवर दगडफेकही केली होती.

ब्रिटीश काळात दुसऱ्या महायुद्धात लष्कराने नेवाळे गावाजवळ धावपट्टीसाठी जागा घेतली होती. मात्र त्यानंतर ती जागा शेतकऱ्यांच्या ताब्यात आली होती. परंतु यावर्षी पुन्हा नौदलाने या जागेवर दावा करत तिथे कम्पाऊंड टाकायला सुरुवात केली होती, याला या शेतकऱ्यांनी विरोध केला होता.

कल्याणमध्ये शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन, पोलिसांच्या गाड्या पेटवल्या