ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात नव्याने बसवण्यात आलेल्या सरकत्या जिन्यात शुक्रवारी रात्री अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि मोठा गोंधळ उडाला. या घटनेत सुदैवानं कुणाला फारशी इजा झालेली नसली, तरी सरकत्या जिन्यांच्या एकंदरीत अवस्थेवरुन प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. एखादी मोठी दुर्घटना होण्याची रेल्वे प्रशासन वाट बघतंय का? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.


ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवर नव्यानंच सरकता जिना बसवण्यात आला आहे. या जिन्याचा पट्टा काल संध्याकाळी अचानक तुटला. गर्दीची वेळ असल्याने अनेक प्रवासी या सरकत्या जिन्यानं वर जात होते. मात्र अचानक पट्टा तुटल्याने जिना उलटा जातोय, अशी अफवा पसरली आणि मोठा गोंधळ उडाला.

या गोंधळात प्रवाशांनी पळापळ सुरु केल्यानं काही प्रवासी जखमीही झाले. मात्र अशाप्रकारच्या घटना ठाणे स्थानकात वारंवार घडत असून रेल्वे त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

शिवाय, ठाणे रेल्वे स्थानकात आज जितके सरकते जिने आहेत, त्यातले बहुतांशी जिने महिन्याचे 15 दिवस बंदच असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन ही बाब गांभीर्यानं घेऊन काही सुधारणा करते का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.