Raj Thackeray : मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा देण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पीएफआय संघटनेने धमकी दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून आता राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय होऊ शकतो. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंबंधी 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिल्यानंतर आता त्याविरोधात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. छेड़ोगे तो छोडेंगे नही असं म्हणत लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी मनसेला दिला होता. 


मागील काही महिन्यांपासून राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता त्यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्याला हात घातला आहे. माझा मुद्दा हा धार्मिक नसून सामाजिक असल्याचे त्यांनी म्हटले होते. तर, दुसऱ्या बाजूला 3 मे नंतर हिंदूनी तयार राहण्याचेही आवाहन केले होते. राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर केंद्र सरकारकडून त्यांना सुरक्षा पुरवली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, याआधी केंद्र सरकारने महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेणाऱ्या राजकीय नेत्यांना सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे राज यांनाही आता केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवल्यास त्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या राज यांना मुंबई पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाते. 


अयोध्या दौऱ्यात उत्तर प्रदेश पोलिसांची सुरक्षा


राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांना या दौऱ्यात उत्तर प्रदेश सरकार विशेष सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: