मुंबईकरांनो, मयुरेशसाठी 'इथला' एक तरी वडा-पाव विकत घ्या!
एबीपी माझा वेब टीम | 11 Oct 2017 03:33 PM (IST)
येत्या 14 ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी दिवसभर वडापाव विकून, जे पैसे जमा होतील, ते हळदणकर कुटुंबाला देण्यात येणार आहेत.
मुंबई: एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या मयुरेश हळदणकरच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी अनेकजण पुढे आले आहेत. मयुरेश हा वरळीतील हळदणकर कुटुंबियांचा एकमेव आधारस्तंभ होता हळदणकर कुटुंबाची व्यथा एबीपी माझाने दाखवल्यानंतर आता मदतीचा ओघ सुरु झाला आहे. फूल ना फुलाची पाकळी म्हणून अनेकजण आपआपल्या परीने शक्य ती मदत करत आहेत. हळदणकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या हेतूने, ‘आपला वडापाव सामाजिक उपक्रम’ राबवण्यात येत आहे. येत्या 14 ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी दिवसभर वडापाव विकून, जे पैसे जमा होतील, ते हळदणकर कुटुंबाला देण्यात येणार आहेत. सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या वडापावची किंमत अवघी 5 रुपये असेल. त्यामुळे मुंबईकरांनो, येत्या शनिवारी मयुरेशसाठी एक तरी वडापाव नक्की विकत घ्या, असं आवाहन करण्यात आलं आहे. स्थळ: सारथी हॉटेलसमोर, स्वामी समर्थ मठाजवळ, ज.भा. मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई- 25एकुलता आधारस्तंभ गमावला 29 सप्टेंबरला एल्फिन्स्टन स्टेशनवरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत हळदणकर कुटुंबीयांनी आपल्या काळजाचा तुकडा गमावला. वरळीच्या 80 नंबरच्या बीडीडी चाळीत छोट्याशा खोलीत मयुरेश हळदणकर कुटुंबासोबत राहायचा. घरात तीन-चार लोक मोठ्या मुश्किलीनं झोपतील एवढीच जागा. वडिलांना नोकरी नाही. आईचं सततचं आजारपण. हळदणकर कुटुंबाचा गाडा एकट्या मयुरेशच्या छोट्या खांद्यावर होता. मयुरेशनंतर आता कुटुंबाची जबाबदारी त्याच्या बहिणीवर आली आहे. तिला सरकारी नोकरी मिळावी अशी मागणी आता हळदणकर कुटुंब आणि समस्त वरळीकर करत आहेत. संबंधित बातम्या