मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर आहेत.  पंतप्रधान विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण यामध्ये करणार आहेत. आता या दौऱ्याआधीच प्रकल्पावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई रंगलेली पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या काळात सुरू केलेल्या आणि ज्या प्रकल्पांना गती दिली ते प्रकल्प का रखडले ? असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरे यांनी बीएमसी आयुक्तांना पत्र लिहित सवाल विचारला आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यवर आहेत. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व असणार आहे. कारण याच दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील अनेक महत्त्वाच्या विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन करणार आहेत. यामध्येच  सांडपाण्यावरील जलशुद्धीकरण प्रकल्प (STP) याचे सुद्धा उद्घाटन केलं जाणार आहे.  आणि यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहून या प्रकल्पाला गती मिळाली असताना हा प्रकल्प सहा महिने का रखडला ? असा प्रश्न विचारत थेट या पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे


मुंबई महापालिकेच्या वतीने प्रस्तावित सांडपाण्यावरील जलशुद्धीकरण प्रकल्प हा ऑक्टोबर 2022 मध्ये आणि समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी तयार करण्याचा प्रकल्प 2023 च्या मध्यापर्यंत भूमिपूजनासाठी तयार होणार होते. मात्र यातील सांडपाण्यावरील जलशुद्धीकरणावरील प्रकल्पाचा भूमिपूजन मविआच्या काळात न होता शिंदे फडणवीस सरकारच्या काळात होत आहे.  त्याचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. त्यामुळे बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने केला जातोय


पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात नेमक्या कोणत्या मुंबई महापालिकांच्या प्रकल्पांचे उद्घाटन होणार? 



  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारीला मुंबईत पालिकेच्या कामांचा शुभारंभ होणार  आहे. बीकेसी येथे  हा कार्यक्रम होणार आहे.

  • मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्यात आले आहेत. 

  • पालिकेची तीन रुग्णालये,  मलनिस्सारण प्लांट, सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते, पंतप्रधान स्वनिधी निधी योजना अशा विविध कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार 

  • आपली चिकित्सा योजने अंतर्गत भांडुप सुपर स्पेशालिटी, ओशिवरा प्रसुतीगृह, गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालय यांच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले आहे. 

  • तसेच 7 मलनिस्सारण प्लांट आणि मुंबईत होणारे 400 किलोमीटरचे सिमेंट कॉंक्रिटचे  रस्ते याचे भूमिपूजन होणार

  •  1 हजार 750 कोटी रुपये खर्चून मुंबईचे सौंदर्यीकरण अशा विविध पाचशेहून अधिक कामांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

  • त्यामुळे बीएमसी निवडणुकांच्या आधी मुंबईवर लक्ष केंद्रित करत या विकास कामांच्या उद्घाटन करण्याचे नियोजन करून याचं पूर्ण शिंदे फडणवीस सरकार घेणार असल्याचे चित्र आहे


महाविकास आघाडीच्या काळात रखडलेले प्रस्तावित प्रकल्प आणि त्यात मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने खास मुंबईकरांसाठी सुरू केलेल्या विकास कामांचे प्रकल्प... या सगळ्याच प्रकल्पाचा पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात लोकार्पण उद्घाटन होत आहे.  त्यामुळे अर्थातच आधीच्या सरकारमधील प्रस्तावित प्रकल्पावरून श्रेयवाद होणार आणि त्याचा पहिला अध्याय या प्रकल्पावरून पाहायला मिळतोय. आता या श्रेयवादाच्या लढाईचा कोणाला कितपत फायदा होतो ? हे बीएमसी निवडणुकातच कळणार आहे.