मुंबई: "कोरेगाव भीमातील हिंसाचार हे मोठं षडयंत्र होतं. येणाऱ्या काळात अशाच प्रकारची जातीयवादी परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते. अशावेळी सर्वांना तिरंग्याखाली एकत्र आणून, भाजप कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे", असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. आज मुंबईत भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.


याशिवाय आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

“भीमा कोरेगाव हे फार मोठं षडयंत्र होतं. सरकारने आपली जबाबदारी नीट पार पाडली. राज्यात येणाऱ्या काळात जातीयवादी तेढ निर्माण करणाऱ्या परस्थिती उद्भवू शकतात. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहावे. लोकांमध्ये सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. जातीय तेढ निर्माण झाल्यास भाजप कार्यकर्त्यांनी तिरंगा झेंड्या खाली सर्वाना सोबत आणावं. भाजप आणि सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी वर  लक्ष द्यावे. लोकांशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा. निवडणुकीच्या तयारीला लागा”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

तिरंगा रॅली

सरकारचा विकास पाहून भाजप आणि सरकारला बदनाम करण्याचा काही मंडळींचा डाव आहे. विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला 26 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली काढून उत्तर दिलं जाईल असं, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

“पक्षाच्या संघटनात्मक ध्येयधोरणवर आज चर्चा झाली. भीमा कोरेगावच्या विषयावर कार्यकर्त्यांना सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. आमचा विकास पाहून भाजप आणि सरकारला बदनाम करण्याचा कट काही मंडळींचा आहे. 26 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली काढणार, विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला भाजपचं तिरंगा रॅलीने उत्तर. विरोधकांची हल्लाबोल अपयशी ठरली आहे, त्याचा काही परिणाम होणार नाही”, असं रावसाहेब दानवे म्हणाले.