Vidhan Parishad Election 2022 : विधान परिषदेसाठी भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून अर्ज दाखल झालेल्या सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी अर्ज माघार घेतला आहे. त्यामुळे आता भाजपकडून 5 उमेदवार रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडूनह 6 उमेदवार रिंगणात आहेत. 


विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोण-कोण मैदानात ? 


भाजप


१) प्रवीण दरेकर
२) राम शिंदे
३) श्रीकांत भारतीय
४)उमा खापरे
५) प्रसाद लाड


शिवसेना


१) सचिन अहिर
२) आमशा पाडवी
 
राष्ट्रवादी


१) रामराजे निंबाळकर 
२) एकनाथ खडसे 


काँग्रेस 


१) भाई जगताप 
२)  चंद्रकांत हंडोरे


आमचा पाचवा उमेदवार निवडून येईल : देवेंद्र फडणवीस 


सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याने आम्ही पाच जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा होती, पण काँग्रेसने दुसरा उमेदवार माघार न घेतल्याने निवडणूक होत आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आमची पाचवी जागा निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सहावी जागा लढणे शक्य नसल्याने सदाभाऊंचा अर्ज माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले. 


राष्ट्रवादीच्या जेलमध्ये असलेल्या सदस्यांच्या दोन मतांचं काय होणार?


राज्यसभा निवडणुकीत एकेक मत महत्त्वाचं असताना राष्ट्रवादीच्या जेलमध्ये असलेल्या सदस्यांच्या दोन मतांचं काय होणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच मुंबई सत्र न्यायालयानंतर उच्च न्यायालयाकडूनही नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी तरी यांना परवानगी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


काही सत्ताधारी आमदारांचा फडणवीस यांना पाठिंबा, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट  


राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाल्यानं महाविकास आघाडीला जोरदार झटका बसला आहे. या निवडणुकीत सरकारला समर्थन देणाऱ्या सहा अपक्ष आमदारांची मतं फुटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीत काय होणार याकडं साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काही सत्ताधारी आमदारांनी फडणवीस यांना पाठिंबा असल्याचे सांगितलं असा दावा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक झाल्यास राज्यसभेप्रमाणे चमत्कार होणार याची चर्चा सुरु झाली आहे. 


चंद्रकांत पाटील यांनी ये तो झंकी है 20 तारीख अभी बाकी है असं म्हणत दावा केला आहे की, विधानपरिषद निवडणुकीतही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. त्यांनी म्हटलं की, राज्यसभेच्या झटक्यातून महाविकास आघाडी योग्य निर्णय करेल.  उद्या अर्ज माघारीची  शेवटची तारीख आहे. मत दाखवून निवडणूक होती त्यात सुद्धा आम्ही विजयी झालो. विधानपरिषदेला तर गुप्त मतदान असल्याने प्रतिसाद जास्त मिळेल. देवेंद्रजींना अनेकांनी हात दाबून आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं सांगितलं आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.