बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन भाजपने शंका दूर करावी : उद्धव ठाकरे
एबीपी माझा वेब टीम | 15 May 2018 02:35 PM (IST)
ईव्हीएमबाबत जो सर्वांच्या मनात संशय आहे, तो भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन काढून टाकावा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मुंबई : भाजपचा पोटनिवडणुकांमध्ये पराभव होतोय, तर निवडणुकांमध्ये विजय होतोय. त्यामुळे ईव्हीएमबाबत जो सर्वांच्या मनात संशय आहे, तो भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन काढून टाकावा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. जे जिंकले आहेत, त्यांचं अभिनंदन करतो, असं ते म्हणाले. शिवाय मुख्यमंत्री कुणीही झाला, तरी त्याने मराठी माणसाचा आदर करावा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. कर्नाटक विधानसभेवर कुणाचा झेंडा हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. कर्नाटकच्या 224 सदस्य असलेल्या विधानसभेच्या 222 जागांसाठी 12 मे रोजी 72.13 टक्के मतदान झालं. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली. भाजपचे 106 उमेदवार (दुपारी 2.30 वाजता) आघाडीवर आहेत, काँग्रेसचे 74, तर जेडीएसचे 39 उमेदवार आघाडीवर आहेत. बहुमताचा आकडा हा 111 आहे. त्यामुळे कर्नाटकात सत्तेची समीकरणं कशी जुळतात, त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. ईव्हीएमचा विजय असो, असं ते म्हणाले होते. संबंधित बातम्या :