मुंबई : 26 जानेवारीला विरोधकांच्या ‘संविधान बचाव’ यात्रेला उत्तर म्हणून भाजपच्या वतीनं ‘तिरंगा यात्रा’ आणि संविधान सन्मान सभा आयोजित करण्यात आली आहे. त्याचा कार्यक्रम आज (बुधवार) जाहीर करण्यात आला. 26 जानेवारीला दुपारी 2 वाजता चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन तिरंगा यात्रेला सुरुवात होणार आहे.


त्यानंतर मुख्यमंत्रांच्या उपस्थितीत कामगार मैदानावर संविधान सन्मान सभा होईल. मुंबईतील भाजप मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत ही यात्रा निघेल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशाच यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.

संविधान बचाव रॅलीच्या सांगता कार्यक्रमाला परवानगी नाकारली

दुसरीकडे मुंबईत 26 जानेवारीला विरोधकांची संविधान बचाव रॅली निघणार आहे. यावेळी गेट ऑफ इंडियावर होणाऱ्या या रॅलीच्या सांगता कार्यक्रमाला मुंबई पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडियानं ही परवानगी नाकारली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात होणार असून गेट वे ऑफ इंडियावर याची सांगता होणार होती. यावेळी गेट वे ऑफ इंडिया येथे मूक धरणे आंदोलनही करण्यात येणार होते.

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा लाँग मार्च निघणार असून शरद पवार, राजू शेट्टी, सीताराम येचुरी, हार्दिक पटेल यासारखे नेते सहभागी होणार आहेत. शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या कल्पनेतून हा संविधान बचाव मार्च निघणार आहे.

संबंधित बातम्या :

पवार, येचुरी, हार्दिक पटेल.. 26 जानेवारीला संविधान बचाव सत्याग्रह