मुंबई :  भाजपचे नेते, आमदार आणि व्यावसायिक प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. असेच एक पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुंबई पोलीस आयुक्तांना (Mumbai Police) पत्र लिहिले आहे. गायकवाड नामक व्यक्तीकडून जीवे मारण्याबाबत विविध मार्गांचा अवलंब करत प्रयत्न करत असल्याचा उल्लेख आमदार प्रसाद लाड (Pradad Lad Letter) यांनी उल्लेख केला आहे. त्याशिवाय, एक अनोळखी व्यक्ती आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे लाड यांनी म्हटले. 


पत्रात नेमकं प्रसाद लाड काय म्हणाले?


मला प्राप्त झालेल्या पत्रानुसार या पत्रात राहुल कंडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड नामक व्यक्तीकडून मला जीवे मारण्याबाबत विविध मार्गांचा अवलंब करत प्रयत्न करत असल्याबाबत या पत्रात उल्लेख आहे. याबाबत राहुल कंडागळे यांनी महिन्याभरापूर्वी खार पोलीस स्टेशनला याची रितसर कल्पना दिली होती. त्याचबरोबर यांनी गायकवाड नामक व्यक्तीने जितेंद्र कांबळे व त्याचे दोन सहकारी यांना दगडी चाळ व तसेच चेंबूर येथे घेऊन गेल्याचे पत्रात नमूद केलेले आहे. त्याप्रमाणे जितेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल गायकवाड नामक व्यक्ती वरील नमूद दोन ठिकाणी घेऊन गेला होता. त्याप्रमाणे राहुल कंडागळे तसेच जितेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गायकवाड व्यक्ती आहे का ? याचा तपास होणे आवश्यक आहे. 


राहुल कंडागळे यांनी महिन्याभरापूर्वी माहिती दिलेली असताना सुद्धा यावर कोणतीच कारवाई झालेली दिसून येत नाही. त्याचप्रमाणे मागील आठवड्यात माझ्यासह माझे सहकारी हे अमित पवार यांच्यावर अनोळख्या व्यक्तीकडून पाळत ठेवण्यात येत असल्याबाबत निदर्शनास आले आहे. माझ्या राहत्या घराजवळ व ऑफिसजवळ एक अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचे मला जाणवले आहे. या सर्व घटनांबाबत सोबत जोडलेल्या पत्रांच्या माध्यमातुन रितसर माहिती देण्यात आलेली आहे. यातील एक विषय 'श्रमिक उत्कर्ष सभा' या युनियनच्या संबंधित असून तसेच दुसरा विषय हा माझ्या व्यवसायाशी संबंधित आहे. तरी मी एक लोकप्रतिनिधी या नात्याने विविध क्षेत्राशी संबंध येत असतो. 


याबाबतचे निवेदन मागील आठवडयात सह-आयुक्त गुन्हे व कायदा सुव्यवस्था यांना दिली होती. तरी वरील दोन्ही विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन तातडीने दखल घेण्यात यावी. व आपणांकडुन उचित कारवाई करण्यात येईल अशी मी अपेक्षा बाळगतो.