मुंबई : विधानसभेत भारतमातावरुन उठलेला गदारोळ थांबत नाही तोच तिरंग्यावरुन नवा वादंग सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तिरंग्याला तोंड पुसल्याचं चित्रिकरण असल्याचा दावा करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी आव्हाडांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावरुन सभागृहात एकच गोंधळ उडाला.


 

आव्हाडांनी तिरंग्याला तोंड पुसल्याची क्लिप आमच्याकडे असून ती पाहिल्यानंतरच अध्यक्षांनी निर्णय घ्यावा अशी मागणी संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी केली.

 

मात्र सभागृहात मोबाईल घेऊन चित्रिकरण झालंच कसं? ते कोणी केलं? आणि कोणाच्या आदेशावरुन केलं ?हे आधी शोधून काढा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी केली. तसंच राष्ट्रगीत सुरू असताना पंतप्रधान मोदी चालत होते याची आठवणही भाजप नेत्यांना करुन दिली.

 

जयंत पाटलांच्या या विधानानंतर भाजप नेते आक्रमक झाले आणि सगळेच एकावेळी वेलमध्ये उतरले.

 

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या गोष्टी आता बोलणं गरजेचं नाही. तिरंग्याची आचारसंहिता जपणं गरजेचं आहे असं सांगत अर्ध्या तासासाठी विधानसभा तहकूब केली.