भिवंडी : एकीकडे मुस्लिम महिलांची तीन तलाकमधून सुटका व्हावी, यासाठी सरकाने कायदा करण्याची तयारी सुरु केली असतानाच, दुसरीकडे भिवंडीत एका महिलेला हुंड्यासाठी रजिस्टर पोस्टाने तीन तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेने पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


पती सरदार मन्सूरी, सासरा इसरार ,सासू जुलेखा, दीर रेहान, जाऊ अफरीन ( सर्व रा.गुलजार नगर ) अशी गुन्हा दाखल केलेल्या सासरच्या मंडळींची नावं आहेत.

पीडित महिला शबनम ( २० रा. विठ्ठल नगर भिवंडी ) हिचे ५ मे २०१६ रोजी सरदार याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून शबनमच्या आई-वडिलांनी जावई सरदारला मोटार सायकल दिली होती. मात्र सरदार आणखी एक मोटार सायकल, टीव्ही, सोफा आणि 50 हजार रुपयांची मागणी शबनमकडे करत होता. या मागणीला शबनम नकार देत असे. तेव्हा क्षुल्लक कारणावरुन सरदार शबनमला जबर मारहाण करत असे. तसंच तिचा मानसिक छळही सुरु होता.



या त्रासाला कंटाळून शबनम एक वर्षांपासून आपल्या आईकडे राहत होती. मात्र पोस्टाने एक पत्र आलं की, शबनमला 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तीन तलाक देण्यात आला आहे. या पत्रानंतर शबनम आणि तिच्या आई-वडिलांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. आपल्याला न्याय मिळेल ही अपेक्षा शबनम करत आहे.