मुंबई : न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाच्या दारात विष पिणाऱ्या धर्मा पाटील यांचा अखेर मृत्यू झाला. 22 जानेवारीला विषप्राशन केल्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या मृत्यूनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडलं, मात्र त्यांना धर्मा पाटील यांच्याबाबतीत खरंच काही माहिती होती का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


''महाराष्ट्रातील शेतकरी धर्मा पाटील यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मंत्रालयात विषप्राशन केलं. मात्र या सरकारने त्यांना वाचवलंही नाही आणि कसली मदतही केली नाही. त्यांना मरु दिलं. ते मुख्यमंत्री कार्यालयात गेले, मात्र रिकाम्या हाताने परतले,'' असं ट्वीट संजय निरुपम यांनी केलं.



धर्मा पाटील यांना जमीन संपादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने त्यांनी हतबल होऊन मंत्रालयात विषप्राशन केलं होतं. सरकारचे उंबरे झिजवूनही कुणी दखल घेत नसल्याने न्याय मागण्यासाठी त्यांना मंत्रालयात यावं लागलं. विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. मात्र संजय निरुपम धर्मा पाटील यांच्या बाबतीत अनभिज्ञ असल्याचंच या ट्वीटवरील प्रतिक्रियेतून दिसून आलं.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.

भाजप सरकार हे कडेलोट करण्याच्या लायकीचं: राजू शेट्टी


धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला.

इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं.

धर्मा पाटलांच्या विषप्राशनानंतर जाग आलेल्या सरकारने पाटील यांच्या कुटुंबीयांना 15 लाखाचं सामुग्रह अनुदान देऊ केलं. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी पाटील कुटुंबाने लावून धरली आहे.

संबंधित बातम्या :

धर्मा पाटलांची प्रकृती चिंताजनक, अवयवदानाचा अर्ज भरला


15 लाखांचं अनुदान धर्मा पाटलांच्या मुलाने नाकारलं


मंत्रालयात 80 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर