मुंबई : 'मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनचं नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करा,' असं म्हणत भीम आर्मी संघटनेने आज आंदोलन केलं आहे. भीम आर्मीच्या कार्यरर्त्यांनी दादर स्टेशनमध्ये शिरत जागोजागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस लिहिलेले स्टिकर्स चिकटवले.


पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर, प्रभादेवी या स्टेशनची नावं बदलण्यात आली. मग दादरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का दिलं जात नाही, असा प्रश्न भीम आर्मीने उपस्थित केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी ही मागणी लावून धरली आहे.

मात्र दादर रेल्वे स्टेशनचं नाव बदलू नये, अशी भूमिका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. नामांतराच्या मागणीऐवजी लोकांनी डॉ. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावेत. दादर स्टेशनसह अनेक वास्तू या मुंबईच्या अस्मितेच्या प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांची नावं बदलण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.