मुंबई : राज्यात सध्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे, माझा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचं उत्तर द्यावं. फडणवीस यांनी तब्बल 21 जणांना त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे त्यांच्या बाबत काय बोलणार असं देखील भाई जगताप 'एबीपी माझा'शी बोलताना म्हणाले.


मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याला उत्तर देताना भाई जगताप बोलत होते. राजीनाम्याच्या विषयाबाबत अधिक बोलताना भाई जगताप म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा परमबीर सिंग यांच्या माध्यमातून लेटर बॉम्ब टाकून झाला. याबाबत मोठ्या प्रमाणात बोंबा बोंब करून देखील झाली. परंतु, त्यांचे सर्व पर्याय निष्क्रिय होत असल्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत ते मागणी करत आहेत. परंतु, त्यांना माझं सांगणं आहे की महाविकास आघाडी सरकार राज्यात पाच वर्षांचा कार्यकाळ व्यवस्थितरित्या पूर्ण करेल. 


देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रकरण दाबली : जगताप
मागील पाच वर्षांचा आलेख पाहिला तर देवेंद्र फडणवीस यांची अनेक प्रकरण आहेत. जी त्यांनी दाबून टाकली. उदाहरण द्यायचं झालं तर नवी मुंबईतील सिडको जमिनीचा घोटाळा सर्वश्रुत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोची अडीच हजार कोटींची जमीन केवळ तीन कोटीत विकली होती. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये असणारे त्यांचे दलाल सध्या त्यांच्या पक्षात मोठे पदाधिकारी आहेत. दुसरा घोटाळा म्हणजे मंत्रालयातील उंदीर मारण्याचा घोटाळा. त्यांच्या काळात जो उंदीर घोटाळा झाला होता. त्यात त्यांनी एका आठवड्यात 3 लाख 400 उंदीर मारले होते, अशी माहिती दिली होती. जर याचा हिशोब काढला तर प्रत्येक मिनिटाला 32 उंदीर यांनी मारले असल्याच्या गोष्टी केल्या होत्या. त्यावेळी आम्ही वारंवार मागणी करून देखील यांनी राजीनामे घेतले नाहीत. 


1 दिवसात 5 जणांना क्लीनचिट देणारे हे फडणवीस : भाई जगताप
उलट 1 दिवसात 5 जणांना क्लीनचिट देणारे हे फडणवीस आहेत. त्यांचं डोकं आता ठिकाणावर नाहीये. त्यांनी कामगार मंडळावर एका वॉन्टेंड गुन्हेगाराची नेमणूक केली होती. मुन्ना यादव नावाच्या गुंडाची नेमणूक केली होती. माझा यांना सवाल आहे की, यांनी उत्तर द्यावे पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कोणत्या आधारावर वर्ग केली होती? त्यावेळी यांना राजीनामा दिला होता का? अशा प्रकारची आम्ही 25 प्रकरणं समोर आणली. परंतु, यांनी फडणवीस सरकारने सगळ्यांना क्लीन चिट दिली होती. म्हणून आम्ही त्यांना 'क्लीन चीट' मिनिस्टर म्हणायचो. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे हे म्हटले होते की, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर 80 कोटी खर्च केले. ते त्यांनी कुठे खर्च केले ते सांगावं फसणवीस सरकारनं. राहिला प्रश्न वाझे प्रकरणाचा तर आम्ही वाझे प्रकरणात सविस्तर चौकशी करू. तुमच्याप्रमाणे क्लीनचिट आम्ही देणार नाही. नुकतेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहेत. आणि काही आरोप केले आहेत. माझा त्यांना सवाल आहे की, तुम्ही कमिशनर होता त्यावेळी परमबीर का बोलले नाहीत. त्यांनी अयोग्य काम केलं म्हणून कारवाई झाली की लगेचच त्यांना कंठ फुटला. अगोदर का नाही फुटला?