मुंबई : वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडून अर्णब गोस्वामींसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याला तसेच नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्याची मागणी करत अर्णबसह इतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बुधवारी हायकोर्टानं त्यांनी ही परवानगी दिली असून अलिबाग दंडाधिकारी कोर्टाला आरोपपत्रावरील त्यांची प्रक्रिया जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अर्णबसह अन्य आरोपींना लवकरात लवकर आरोपपत्राची प्रत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देत यावरील सुनावणी 6 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.


न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर बुधवारी यावर ऑनलाईन सुनावणी पार पडली. याच खंडपीठासमोर अर्णब गोस्वामी यांच्या कंपनीनं फेक टीआरपी प्रकरणी दाखल केलेल्या याचिकांवरही सुनावणी झाली. ज्यात रिपब्लिक टीव्हीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणीपर्यंत रिपब्लिकचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.


फेक टीआरपी प्रकरणात पोलीस तपास करु शकतात, असं खंडपीठानं स्पष्ट केलं आहे. रिपब्लिकच्यावतीने एआरजी आऊटलिअर मीडियाने न्यायालयात याचिका केली आहे. 6 जानेवारी 2021 रोजी ऑनलाईन सुनावणी होणार असून ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे हे याचिकाकर्त्यांची बाजू मांडणार आहेत. तोपर्यंत हा दिलासा कायम राहील. तोपर्यंत राज्य सरकारने याचिकेवर भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.


दरम्यान, रिपब्लिकचे सीईओ विकास खानचंदानी यांना मुंबई मुख्य दंडाधिकारी कोर्टानं 50 हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला. मागील दोन दिवसांपासून ते अटकेत होते.