मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशनच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. दुसऱ्या तिमाहीच्या निकालात रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम)ला 30 हजाराहून अधिक कोटींचा तोटा झाला होतं. त्यामुळे अनिल अंबानी यांच्यासह आरकॉमच्या चार अधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत. आरकॉम सध्या दिवाळखोरी प्रक्रियेतून जात आहे. कंपनी विविध मालमत्ताही विक्रीला काढणार आहे.


अनिल अंबानी यांच्यासह छाया विरानी, रायना करानी, मंजरी कैकर आणि सुरेश रंगाचर यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचं बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई)ला दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी व्ही. मनीकांतन यांनी संचालकपद आणि मुख्य वित्त कार्यालयातील पदाचा राजीनामा दिला होता.

शुक्रवारी रिलायन्स कम्युनिकेशन्सने दुसऱ्या तिमाहीचे आकडे जाहीर केले आहेत. जुलै ते सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 30,142 कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. दिवाळखोरीच्या प्रक्रियेत असलेल्या आरकॉमने मागच्यावर्षी याच तिमाहीत 1,141 कोटीचा फायदा कमावला होता. सध्या शेअर बाजारात आरकॉमच्या शेअरचा भाव 59 पैसे आहे. अनिल अंबानी यांची संकटं कमी होण्याऐवजी वाढत आहेत. आरकॉमला एकूण देणं असलेल्या रक्कमेमध्ये 23 हजार 327 कोटी रुपये परवाना शुल्क आणि 4987 कोटी रुपये स्पेक्ट्रम वापर शुल्क यांचा समावेश आहे.

चीनच्या तीन मोठ्या बँकांनी नुकतंच अनिल अंबानी यांच्याविरोधात लंडनच्या कोर्टात 680 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 47 हजार 600 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्सपोर्ट बँक ऑफ चायना या तीन बँकांचा यामध्ये समावेश आहे.