मुंबई : अंधेरीतील रेल्वे पूल दुर्घटनेत जखमी झालेले पालघर येथील प्रख्यात विकासक मनोज मेहता (52) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर मेहता यांच्यावर नानावटी रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार सुरु होते. पण मनोज मेहता यांची मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली.
अंधेरीतील गोखले पुलाचा पादचारी भाग कोसळल्याची दुर्घटना 3 जुलै रोजी घडली. या अपघातात त्या दिवशी नेहमी प्रमाणे अंधेरी- डहाणू रोड लोकल पकडण्यासाठी आलेले मनोज मेहता हे गंभीर स्वरूपात जखमी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
राजेश बिल्डर्सच्या माध्यमातून त्यांनी पालघर- बोईसर परिसरात 30-35 वर्षांपासून अनेक गृह संकुलांची उभारणी केली. रोटरी क्लब ऑफ पालघरचे त्यांनी काही काळ अध्यक्षपद भूषवलं होते. त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात परिसरात भरीव योगदान दिलं होतं.
दरम्यान, याच दुर्घटनेतील जखमी अस्मिता काटकर यांचाही 7 जुलैला मृत्यू झाला होता.
अंधेरी दुर्घटना कशी घडली?
अंधेरी रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या गोखले ब्रिजच्या फुटपाथचा काही भाग कोसळला होता. यावेळी ढिगाऱ्याखाली अडकून पाच जण गंभीर जखमी झाले. हा फुटपाथ थेट ओव्हरहेड वायरवर कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक दिवसभर ठप्प झाली होती.