अमित शहांची मुंबईत बैठक, संघ नेत्यांशी चर्चा करुन दिल्लीकडे कूच
एबीपी माझा वेब टीम | 10 Mar 2017 02:16 PM (IST)
मुंबई: देशाचं लक्ष उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालाकडे लागलं असतानाच, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. अमित शाह यांनी वरळीतील यशवंत भुवनमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीसाठी काही वेळापूर्वीच मुंबईत आलेले अमित शाह, बैठक संपवून दिल्लीला रवानाही झाले. या बैठकीसाठी संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी आणि कृष्ण गोपाल उपस्थित होते. याशिवाय मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही बैठकीला हजेरी लावली. दरम्यान, संघ नेत्यांसोबतच्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र उद्या पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. संबंधित बातम्या