मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मदतीला धावून आले. मंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच विधानसभेत प्रश्नांना उत्तरं दिली. आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रश्न उपस्थित केला. मात्र ते अडचणीत येतील हे लक्षात येताच अजित पवारांनी हस्तक्षेप करत स्वत: उत्तर दिलं आणि आदित्य यांना अडचणीत येऊ दिलं नाही. ऍ


विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मुंबई आणि कोकण येथील पर्यटन योजनांसाठी विकास निधी उपलब्ध करुन देण्याबाबत, शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी निधी मंजूर केला तरी तो वापरला का नाही असा प्रश्न आमदार भास्कर जाधव यांनी आदित्य ठाकरेंना विचारला होता. या प्रश्नावर पर्यटन मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांनी उत्तरं दिली. कोकण विकास पर्यटनासाठी राज्य सरकार वेगळा निधी देणार असल्याचं सांगत समुद्र पर्यटन, हॉटेल्स यासाठी सरकार धोरण आणणार असल्याचे आदित्य यांनी विधानसभेत सांगितलं. त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याला दिलेला निधी खर्च का झाला नाही, याची चौकशी करु असं आश्वासनही दिलं. तसंच पर्यटनदृष्ट्या कोकण महत्त्वाचा आहेच पण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पर्यटन महत्त्वाचं आहे, असं उत्तरही आदित्य यांनी दिलं.

यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने एक प्रश्न उपस्थित केला. एशियन डेव्हलपमेंट बँक ही पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी निधी देते, मात्र पर्यटन विकासासाठी निधी दिला जात नाही, यासाठी सरकार काय करणार असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. खरंतर हा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला होता. मात्र ते अडचणीत येतील हे लक्षात येताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हस्तक्षेप करत स्वतः उत्तर दिलं. ते म्हणाले की, "गेल्या महिन्यात या संदर्भात बैठक घेतली. विरोधकांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. पायाभूत सुविधांसाठी अशाप्रकारच्या संस्था निधी देण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून विरोधी पक्षांकडून जे काही सुचवण्यात येत आहे, तेच आम्ही अंमलात आणतो. त्याबद्दलच आदित्य ठाकरेंनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं." अशाप्रकारे पहिल्यांदाच उत्तर देणाऱ्या आदित्य यांच्या साथीला अजित पवार धावून आले.