मुंबई : सुट्ट्या पैशांसाठी मुंबईत दलालांनी सर्वसामान्यांची लूट चालवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपासून (9 नोव्हेंबर) 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केली होती. यानंतर काही वेळातच नागरिकांनी एटीएमवर गर्दी करुन 100 रुपयांच्या नोटा मिळवण्याचा प्रयत्न केला होता.


आजपासून 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यामुळं सुट्ट्या पैशांसाठी वणवण सुरु आहे. याच परिस्थितीचा काही दलालांनी आणि दुकानदारांनी गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे. 500 रुपयांची नोट सुट्टी करून देण्यासाठी 100 रुपये कमिशन उकळलं जातं आहे, तर काही ठिकाणी 500 रुपयांच्या बदल्यात 450 रुपयेही दिले जात आहेत. सुट्ट्या पैशांचा तुटवडा असल्यानं गरजू नागरिकांची लुबाडणूक या दलालांकडून होत आहे.

मुंबईतल्या अशा दलालांना एबीपी माझानं कॅमेऱ्यात कैद केलं आहे. मुंबई फिरायला आलेल्या पर्यटकांना दलाल आणि दुकानदारांकडून लूटलं जात आहे. किरकोळ वस्तू खरेदी करण्यास गेलेल्यांकडून कमिशन उकळल्यानंतर पैसे परत केले जात आहेत. दरम्यान हा प्रकार राजरोसपणे सुरु असतानाही अशा दलालांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कोणतंही पाऊल उचललं जात नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पाहा व्हिडीओ :