Aditya Thackeray On Mumbai Race Course :  मुंबईतील (Mumbai) महालक्ष्मी परिसरातील (Mumbai Race Course) रेसकोर्सच्या मुद्यावरून आता राजकारण पेटणार असल्याची चिन्हं आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महालक्ष्मी रेसकोर्सबाबत मोठा खळबळजनक दावा केला आहे. रेसकोर्सच्या जागेसंदर्भात मागील महिन्यात बैठक झाली असून दोन तीन व्यक्ती मुंबईतील मोकळी जमीन कंत्राटदार-बिल्डरला देऊ शकत नाही. या मोकळ्या जागेवर एक वीटही रचू देणार नसल्याचा इशाराही आदित्य यांनी दिला. 


आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महालक्ष्मी रेस कोर्सची जागा राज्य सरकारच्या जवळच्या बिल्डर मित्राकडून बळकवण्याचा प्रयत्न होत असून संबंधित बिल्डर हा त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाला धमकवत असून करार करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, आज पुन्हा ट्वीट करत आदित्य यांनी खळबळजनक दावा केला आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, रेसकोर्सच्या जागेसंदर्भात 6 डिसेंबर 2023  रोजी सकाळी 11 वाजता बैठक घेण्यात आली. या बैठकीत रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC) व्यवस्थापनाचे चारजण आणि 4  वरिष्ठ अधिकार्‍यांसह मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला महापालिका आयुक्तही उपस्थित होते. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही निकषांवर 226 एकर खुल्या जागेची आभासी विक्री आणि जमीन बळकावण्यास सहमती दर्शविली असल्याचे आदित्य यांनी म्हटले. 


कोणत्या निकषांवर महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन ताब्यात घेणार?


आदित्य ठाकरे यांनी केलेल्या दाव्यानुसार, 91 एकर आरडब्ल्यूआयटीसीकडे (व्यवस्थापनाकडे) ठेवली जाईल आणि उर्वरित जमीन मुंबई महापालिका विकासासाठी स्वतःच्या ताब्यात घेईल. RWITC च्या जमिनीसाठी 30 वर्षांच्या लीज करारावर स्वाक्षरी केली जाईल. या प्रस्तावाला सहमती देण्यासाठी इतर घोडे मालकांना प्रभावित करण्यासाठी बीएमसी रेसकोर्सवरील तबेले पुनर्बांधणीसाठी जवळपास 100 कोटी खर्च करणार असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. जिथे व्यवस्थापनाने खर्च करायला हवा, त्या ठिकाणीआमच्या करदात्यांच्या 100 कोटी रुपयांचा वापर का केला जातोय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. 


RWITC ने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत कोणतीही स्पष्टता न देता चर्चा केली आहे. RWITC च्या या 2-3 सदस्यांनी पालिका आयुक्तांना वार्षिक सर्वसाधारण सभेत बाकीच्या सदस्यांना सादरीकरण देण्यास सांगितले आहे, जेणेकरून समितीला इतरांवर प्रभाव पाडण्यास मदत होईल असेही दावाही आदित्य यांनी केला आहे. 


आदित्य ठाकरेंचे सरकारला प्रश्न... 


आदित्य ठाकरे यांनी ट्वीटद्वारे सरकारला काही प्रश्नही केले आहेत. आरडब्ल्यूआयटीसी/एआरसीच्या प्रत्येक सदस्याला सरकारच्या या जमीन हडप प्रस्तावाची माहिती होती का? असा प्रश्न आदित्य यांनी केला.  वरळी रेसकोर्स/मुंबईच्या मोकळ्या जागेवर या उघड विक्रीसाठी या अधिकृत बैठकीपूर्वी गुप्त बैठका झालेल्या या समिती सदस्यांना सदस्यांनी माहिती दिली आहे का? असा सवाल करताना आदित्य यांनी लीज करार संपला असेल आणि RWITC उर्वरित जमीन सोडण्यास तयार असेल, तर ते अर्बन फॉरेस्ट/क्रीडांगण म्हणून आरक्षित केले जाऊ शकते असेही म्हटले आहे. 


आदित्य ठाकरेंचा इशारा...


मुंबईच्या या मोकळ्या जागेवर आम्ही त्यांना एक वीटही रचू देणार नसल्याचा इशारा ठाकरेंनी दिला आहे.  दोन-तीन व्यक्ती मुंबईतील जमीन 'बिल्डर-कंत्राटदार सरकारला' देऊ शकत नाहीत.आम्ही मुंबईकर प्रत्येक स्तरावर यासाठी लढा देऊ आणि ही जमीन हडप होऊ देणार नाही असे आव्हानही त्यांनी केला.