मुंबई :  मुंबई आणि शहरानजीक असणाऱ्या अनेक कोळीवाड्यांच्या विकासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. किंबहुना शहराचे मूळ रहिवासी म्हणून ओळख असणाऱ्या कोळी समुदायाच्या अनेक मागण्यांवर विकासाच्या दृष्टीकोनातून पावलंही उचलण्यात येत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत मंगळवारी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. मुंबईतील उर्वरीत कोळीवाड्यांचे सीमांकन जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी आदित्य ठाकरे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.


मुंबईतील उर्वरित कोळीवाड्यांचं सीमांकन करण्याची प्रक्रिया जलद गतीनं पूर्ण करण्यात यावी यासाठी आदित्य ठाकरे आग्रही दिसले. कोळीवाडे, आदिवासी पाडे किंवा गावठाणाचा भाग लगत आहे तिथे कोळीवाड्याचे सीमांकन करणे गरजेचे आहे, असं मत मांडत अस्लम शेख मुंबईतील बहुतांश कोळीवाड्यांचे सीमांकन झाले असून उर्वरित कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यासाठी संबंधीत यंत्रणांनी लवकर सर्वेक्षण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.


CoronaVirus | लॉकडाऊन पाहिजे की..., नियमांची पायमल्ली होत असल्यास कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


यावेळी मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही जिल्ह्यातील कोळीवाडे सीमांकनाबाबतच्या सद्यस्थितीची माहिती दिली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्यासह संबंधीत विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.