Aditya Thackeray Meet Nakhwa Family Worli Hit And Run : वरळी सी लींक रोडवर राजकीय नेते राजेश शाह यांच्या मुलाने म्हणजेच मिहिर शाहाने कावेरी नाखवांना चिरडलं होतं. मिहीरनं मृत कावेरी नाखवा यांना दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेलंच, पण त्यानंतर पुढे सीलिंकवर गाडी थांबवून त्यांना बाजूला काढलं आणि पुन्हा त्यांच्याच अंगावरुन गाडी घालून पळून गेला होता. त्यानंतर पोलीसांनी मुख्य आरोपी महिर शाह याला अटक केली होती, न्यायालयाने आज आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी हिट अँड रन प्रकरणातील पीडित कुटुंबाची भेट घेतली. आदित्य ठाकरे घरात आल्यानंतर नाखवा बाप लेकींनी अक्षरश: टाहो फोडला. फरफटत नेलंय , त्याला सोडायचं नाही, अशी मागणी कावेरी नाखवा यांच्या मुलीने आदित्य ठाकरेंकडे केली आहे. 


मिहीर शाहला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी


वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मिहीर शाहाला (Mihir Shah) शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गाडीची नंबर प्लेटही गहाळ झाली असून तिचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं आहे. तसेच आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी कापल्याचेही पोलिसांनी न्यायालयात नमूद केलं आहे. दरम्यान,  इतर मदत केलेल्या लोकांचा शोध घेता , यावा यासाठी पोलीसांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली आहे. 


आरोपी मिहीर शाह अन् राजेश शाह राक्षस असल्याचे लोक म्हणतात : आदित्य ठाकरे 


आरोपीला कोळी वाड्यात भर चौकात सोडा अशी मागणी आहे. राजेश शाह, मिहीर राजेश शाह हा राक्षसच आहे. सीसीटीव्ही पूर्ण आहे, इंटेलिजन्स आहे, मग आरोपीला अटक करण्यास 60 तास का लागले?, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. आरोपी जर थांबला असता तर एक जीव वाचला असता, लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे. पुढची कारवाई कशी असणार? बुलडोझर चालवा, नाकाबंदी लावा...आधी राजेश शहाच्या घरावर बुलडोझर चालणार आहे का? असे अनेक सवाल आदित्य ठाकरेंनी नाखवा कुटुंबाची भेट घेतल्यानंतर उपस्थित केले आहेत.