मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Resign) यांनी आज अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh case) हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, संतापाची लाट उसळली. त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती, आज अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर आता विरोधक देखील आक्रमक झाल्याचं चित्र आहे. तर शिवसेना ठाकरे गटाते आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठ्या मागण्या केल्या आहेत. सुधारित चार्जशीट दाखल करा, धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, सरकार बरखास्त करा असं ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंच्या तीन मागण्या

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मिडीयाच्या माध्यमातून आम्हाला धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती मिळाली आहे. फक्त राजीनामा स्वीकारून चालणार नाही, तर हे सरकार बरखास्त केलं गेलं पाहिजे. संपूर्ण राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील परिस्थिती आपण पाहतात. कुठे लहान मुलींवर अत्याचार, कुठे महिलांवर रेप होतो. मग तिथे गृहराज्यमंत्री बोलतात की, हे सगळं शांततेत पार पडला आणि म्हणून काही ॲक्शन करू शकत नाही. बसमध्ये एखादा रेप होतो आणि मंत्री सांगतात, आम्ही अवेअरनेस वाढवायचा प्रयत्न करतो. तसंच संतोष देशमुख प्रकरणी आपल्याला आठवत असेल साधारणपणे डिसेंबरपासून हा विषय सुरू आहे. खून कधी झाला त्याच्यानंतर जे अधिवेशन झालं. ते अधिवेशन झाल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळेच आमदारांनी हा विषय घेतला होतं, हे प्रकरण नागपूरमध्ये लावून धरला होता आणि आम्ही हीच मागणी करत होतो की, एका पारदर्शक चौकशीसाठी ज्यांचं नाव येते आका म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, आम्हीच नाही तर भाजपचे देखील नमिताताई असतील, सुरेश धस असतील हे देखील स्वतः भाजपचेच आमदार राजीनामाची मागणी करत होते.

प्रत्येक बाजूनी भाषण झालं, प्रत्येकाने भाषणात संतोष देशमुख, अत्याचार असतील यावर भाष्य केलं. जितेंद्रजी आव्हाड यांनी देखील आपल्याला आठवत असेल भाषण करून संपूर्ण हाऊसला स्तब्ध केले होतं. पण हे सगळं झाल्यानंतर देखील आम्हाला वाटलं होतं मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील. पण, मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी बांधले होते. कोणी बांधले होते. मैत्रीच्या नात्यात बांधले होते. कलेषण धर्मामध्ये बांधले होते. आम्हाला माहित नाही. पण, आम्हाला सांगितलं होतं त्यांनी की आम्ही न्याय देऊ चौकशी लवकरच लवकर पूर्ण होईल. डिसेंबर संपूर्ण गेला जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मार्चमध्ये हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर कालचे भयानक फोटो आलेले आहेत. मला वाटत नाही महाराष्ट्राने कधीही अशी हत्या पाहिली असेल. म्हणजे काल रात्री ते पाहताना देखील व्हिडिओ पाहताना देखील डोळ्यात पाणी होतं. अजूनही विचार करू शकत नाही की, त्या परिवारावर आता हे सगळं पाहून काय  त्यांच्या मनात असेल, माझही मन हेलावून गेलेला आहे. आज आपण पाहतोय की, महाराष्ट्रात एक तरुण सरपंच असेल तो कोणाचा भाऊ असेल, कोणाचा मुलगा असेल, कोणाचे वडील असेल, सगळ्यात महत्त्वाचे भाजपचे पण कार्यकर्ते होताच. 

आज आपण काही लोकांना पाहतो, धमक्या देतात की, आम्ही फंड नाही देणार, सरपंच ना असं करू, तसं करू, सरपंच न्याय द्या पहिला सरपंचाला न्याय नाही दिला तर आपण राज्य म्हणून चाललो तरी कुठे, गुन्हेगारी सुरू आहे ती थांबलीच पाहिजे, म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की, फक्त एका मंत्राच्या राजीनामा नाही, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कारण काल अजून एक बातमी कानावरती आली होती, ती म्हणजे मुख्यमंत्री स्वतः एका लाल गाडीत बसून उपमुख्यमंत्री महोदयांच्या घरी गेलेले आहेत. अजितदादांच्या घरी गेलेत आणि तिथे बैठक झाली की, आता राजीनामा स्वीकार करायचा की नाही करायचा? राजीनामा द्यायचं की नाही द्यायचा? पण आता इथे थांबून चालणार नाही, तर आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून की सरकारचं बरखास्त झालं पाहिजे,असंही पुढे आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.