मुंबई : वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा नारळ चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी फोडला. मात्र आतापर्यंत विकास झाला नाही, असं म्हणत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते आज म्हाडाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. बीडीडी चाळीसंदर्भात मुख्यमत्र्यांकडून गठन केलेल्या समितीमध्ये एकही शिवसेना आमदार नाही. त्यामुळे या शिवसेना आमदारांमध्ये नाराजी आहे, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.


आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा वरळी, शिवडीच्या बीडीडी चाळीच्या प्रश्नांना तोंड फोडलं आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासाचा नारळ चार वर्षांपूर्वी फुटला होता, पण पुढं काहीच झालं नाही. त्यामुळं मला इथं यावं लागलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  गेल्या चार वर्षांपूर्वी बीडीडी चाळीचा पुर्नविकासाचा नारळ मुख्यमंत्र्यांनी फोडला होता पण अद्याप कोणताही विकास झाला नाही, असंही ते म्हणाले.

मला यात राजकारण करायचं नाही, पण या कामाला वेग यायला हवा, लोकांचा आवाज ऐकला तर पुनर्विकास शक्य आहे असं देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले. पोलिसांच्या घरांबद्दल लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून तीस वर्षावरील वास्तव्यास असलेल्या पोलिसांनी मालकी हक्काची घरं देणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. पण तीस वर्षापेक्षा कमी कालावधी घेण्यात यावा ही मागणी करणार असल्याचे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

सध्या गृहनिर्माण मंत्री भाजपकडे आहे तर म्हाडाचं अध्यक्ष पद उदय सामंत यांच्याकडे पण बीडीडी चाळीसंदर्भात मुख्यमत्र्यांकडून गठन केलेल्या समितीमध्ये एकही शिवसेना आमदार नाही. त्यामुळे या शिवसेना आमदारांमध्ये नाराजी आहे. पण आपण लोकांसाठी काम करतो आम्हाला समितीपेक्षा लोकांमध्ये राहण्यात जास्त आवडतं त्यामुळे लोकांचा विकास हेच आमचं स्वप्न असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.