मुंबई : अतिवृष्टीमुळे मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली आहे. यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची विशेष मोहीम एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ठाणे-खाडीपूलावरील खड्डे बुजवण्याचे व डांबरीकरणाचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर सायन पनवेल मार्गावरील वाहतूकीचा ताण कमी होणार आहे.


ठाणे खाडी पुलावरून हजारो वाहने ये-जा करत असतात. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या मार्गावर मोठे मोठे खड्डे पडले असून रस्त्याची अगदी चाळण झाली आहे. यामुळे वाहतूकीची गती मंदावली आहे. विशेष म्हणजे यावर्षी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे पुलावरील खड्डे बुजवण्यात अनेक अडचणी आल्या होत्या.

आता पावसाने उसंत घेतल्यावर एमएसआरडीसीने पुलावरील खड्डे बुजवण्याचे आणि डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. नवीन वर्षाच्या पूर्वीच हे काम पूर्ण होईल आणि वाहतूक कोंडी सुरळीत होण्यास मदत होईल अशी आशा एमएसआरडीसीकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, या पुलाचे काम सुरु असल्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी होत होती. आता या पुलाचे काम झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊन तेथील वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.

कामासाठी 4 कोटी खर्च ?
एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांच्या मते, या पुलाच्या दुरुस्ती व डांबरीकरणाचे कामासाठी 4 कोटी 25 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. डांबरीकरण करताना वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच पुलाच्या डांबरीकरणाचे काम टप्प्या-टप्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल.