घातक रसायनांचा वापर करून पिकवलेले 890 किलो आंबे जप्त!
एबीपी माझा वेब टीम | 21 Apr 2017 11:57 PM (IST)
उल्हासनगर: उन्हाळा सुरू आहे आणि प्रत्येकाच्या घरात फळांचा राजा आंबा आवर्जुन आणला जातो. मात्र, तुम्ही खात असलेला आंबा कसा पिकवला आहे याची खातरजमा करून घ्या. कारण घातक रसायनांपासून पिकवलेले तब्बल 890 किलो आंबे उल्हासनगरमध्ये जप्त करण्यात आले आहेत. उल्हासनगर महापालिका आणि अन्न-औषध विभागानं संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. उल्हासनगर कॅम्प 1 मधील परिसरातून हे घातक आंबे जप्त करण्यात आले आहेत. उल्हासनगर कॅम्प 1 भागातील आंब्याच्या दुकानावर धाड मारुन हे आंबे जप्त करण्यात आले. आंबे लवकर पिकावेत यासाठी विक्रेते सर्रासपणे घातक रसायनाचा वापर करतात. त्यामुळे आंबे खरेदी करताना ग्राहकांनी दक्ष राहावं असं आवाहन अन्न-औषध विभागानं केलं आहे.