मुंबई : जर राष्ट्रपतींनी 31 मार्चपर्यंत इच्छामरणाच्या अर्जावर निर्णय घेतला नाही तर माझ्या पतीला माझी गळा दाबून हत्या करण्याची मुभा आहे, असं म्हणत स्वत:च्याच हत्येचं प्लॅनिंग मुंबईतील गिरगावच्या दाम्पत्याने केलं आहे.


नारायण लवाटे आणि इरावती लवाटे असं या दोघांचं नाव आहे. या दोघांचही वय 80 पेक्षा जास्त आहे. त्यांना मूलबाळ नाही. शिवाय जवळचे मोजकेच नातेवाईक सोडले तर आपलं म्हणणारं कुणी नाही. त्यामुळे त्यांनी इच्छामरणाचा निर्णय घेतला आहे.



नारायण लवाटे एसटीत सुपरवायजर होते, तर इरावती प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. या दोघांनाही वाढत्या वयाप्रमाणे आपल्याला आजार जडून आपले हाल होतील, अशी भीती आहे.

जवळचं कुणी नसल्याने शरीराला त्रास देण्यापेक्षा मरण पत्करण्याची या दाम्पत्याची इच्छा आहे. मात्र आता राष्ट्रपतींनी 2 महिन्यानंतरही इच्छामरणावर निर्णय न घेतल्याने त्यांनी 31 मार्चनंतर आम्ही एकमेकांची हत्या करु असं म्हटलं आहे.

वाढत्या वयामुळे घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. सारखं घरात बसून रहावं लागतं. जगात आपलं म्हणणारं कुणी नाही. मेट्रोसाठी रस्ते एवढे खोदलेत की, कुणाच्या तरी हाताला धरल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही, असं इरावती म्हणाल्या.