ठाणे : अंबरनाथमधील एका कंपनीतून तब्बल 750 किलो ड्रग्स रविवारी जप्त करण्यात आलं आहे. ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत 19 कोटी रुपये आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.


ठाणे परिसरात 6 जानेवारीला दोघेजण अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लावून लवकुश पप्पू गुप्ता (26) आणि अमित भीमराव गोडबोले (32) या दोन संशयितांना आनंद दिघे टॉवर येथून ताब्यात घेतलं होतं. या दोघा संशयितांची चौकशी केली असता त्यांच्याकडे 6 किलो अल्प्राझोलम नावाचा अंमली पदार्थ आढळून आला होता.

एनडीपीएस अक्टनुसार परवानगीविना साठा करण्यास किंवा जवळ बाळगण्यास कडक निर्बंध असलेला अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ या दोघांकडे कुठून आला, याची कसून चौकशी अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली. त्यावेळी हा अमली पदार्थ अंबरनाथ येथील एका फार्मासिटीकल कंपनीतून विकत आणल्याचं समोर आलं होतं.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी अंबरनाथ येथील सेंटॉर फॉर्मास्युटिकल कंपनीचा कर्मचारी बसवराज हणमंता भंडारीला (27) ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली. त्यानंतर भंडारी याने हा अंमली पदार्थ सेंटॉर फॉर्मासिटीकल कंपनीतून याच कंपनीचा कर्मचारी असलेल्या अनिल कांता राजभर (25) याच्या साहाय्याने विक्री केल्याचं पोलिसांना सांगितले.