'संदीप देशपांडेंवर कारवाई करा', पालिकेच्या 4200 अभियंत्यांचे राजीनामे
एबीपी माझा वेब टीम | 06 Oct 2016 06:04 PM (IST)
मुंबई: मुंबईतल्या रस्त्याचं खापर फक्त पालिका अभियंत्यांवर फोडलं जात असल्यानं आज पालिकेच्या अभियंत्यांनी राजीनामास्त्र उगारलं आहे. मुंबईतील तब्बल 4200 अभियंत्यांनी पालिका आयुक्त अजय मेहतांकडे राजीनामे दिले आहेत. मात्र आयुक्तांनी हे राजीनामे स्वीकारले नाहीत. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत कामावर परतणार नसल्याची भूमिका अभियंत्यांनी घेतली आहे. निवडणुकांच्या तोंडावर मनसेनं बुधवारी पालिकेच्या मुख्य अभियंत्याला भर रस्त्यात उभं करुन खड्ड्यांना मुख्य अभियंता जबाबदार असल्याची पाटी हातात दिली आणि आंदोलन केलं होतं. त्यानंतर अभियंत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे नगरसेवकांनी रस्ते विभागाचे मुख्य अभियंत्याची बदनामी केल्याप्रकरणी वरळीत महापालिकेच्या अभियंत्यांचे धरणं आंदोलन सुरु केलं आहे. वरळी हब इथे आंदोलन करत आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी देखील या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे. संबंधित बातम्या: मी खड्ड्यांसाठी जबाबदार, मनसेकडून मुख्य अभियंत्यांच्या हाती फलक