MPSC परीक्षेत गैरप्रकार करणारे 42 उमेदवार ब्लॅकलिस्ट!
एबीपी माझा वेब टीम | 26 Mar 2018 12:53 PM (IST)
या 42 उमेदवारांपैकी 13 जणांना तात्पुरतं तर 29 जणांना कायमस्वरुपी ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे.
उस्मानाबाद : एबीपी माझाच्या बातमी आणि पाठपुराव्यानंतर सूत्रं वेगाने हलली आणि एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या 42 उमेदवारांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे. या उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. या 42 उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढील कोणत्याही परीक्षेला बसण्यास बंदी असेल. शिवाय हे उमेदवार कोणत्याही सरकारी नोकरीला पात्र नसतील. या 42 उमेदवारांपैकी 13 जणांना तात्पुरतं तर 29 जणांना कायमस्वरुपी ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे. काय आहे प्रकरण? गेल्या पाच वर्षांमध्ये 400 जणांनी बोगस परीक्षार्थी म्हणून परीक्षा दिल्याचा संशय आहे. त्यापैकी 40 जणांना सरकारी सेवेचा लाभ झाला आहे. बोगस परीक्षार्थींच्या माध्यमातून सरकारी सेवा मिळवणाऱ्या 15 सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने ही कारवाई केली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर आयोगाने आमच्या परीक्षेत असा प्रकार होत नसल्याचा दावा केला होता. परंतु आता 42 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर परीक्षेत गैरप्रकार झाला, यावर शिक्कामोर्तब झालं आहे. संबंधित बातम्याबोगस परीक्षार्थी बसवून सरकारी नोकऱ्या लाटणारे 15 अधिकारी अटकेतढ पोरं अधिकारी झालेत, MPSC घोटाळ्यावरुन अजित पवारांचा हल्ला