पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी या दोन तालुक्यांमध्ये मागील तीन महिन्यांपासून भूकंपाचे हादरे सुरु आहेत. 12 डिसेंबर ते 6 फेब्रुवारीपर्यंत 2.1 रिश्टर स्केल ते 4.1 रिश्टर स्केल यादरम्यान 39 हादरे बसले असून लहान मोठे 600 ते 700 हादरे बसल्याची माहिती पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या हादऱ्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून जनजागृती तसेच जिल्हा प्रशासनामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना सुरु असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

धुंदलवाडी, दापचरी, चिंचले, हळदपाडा या भागात भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता जास्त आहे. तर याच भागात असलेलं कुरझे धरण अनेक ठिकाणी जीर्ण झाले असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

शुक्रवारी (1 फेब्रुवारी) 4.1 रिश्टर स्केल झालेल्या हादऱ्यानंतर हादऱ्याची तीव्रता कमी झाली असून नागरिकांनी जागृत राहून प्रशासनाला सहकार्य करावं, असं आव्हान जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी केलं आहे.