मुंबई : डेडलाईच्या गर्तेत आडकलेल्या मुंबई विद्यापीठाचे राखीव निकाल अखेर जाहीर झाले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने आज 2,300 राखीव विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले आहेत.


प्रथम सत्र 2017 च्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल मुंबई विद्यापीठानं 19 सप्टेंबर 2017 पर्यंत जाहीर केले. मात्र यामध्ये काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते. आज 2 हजार 300 राखीव विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठानं जाहीर केले.

विद्यापीठाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध करून देण्यात आले.

ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका प्रथमदर्शनी आढळून येत नाही, अशा विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने सरासरी गुण देण्याची नियमावली करुन, सुमारे 2300 विद्यार्थ्यांना सरासरी गुण बहाल करण्यात आले आहेत.

दरम्यान, विद्यापीठाच्या दिरंगाईमुळे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची सप्टेंबर अखेर बैठक झाली होती. या बैठकीदरम्यान, विद्यापीठातील राखीव निकाल तातडीने लावण्याचे आदेश राज्यपालांनी दिले होते. तसेच, हिवाळी सत्रानंतरच्या परिक्षांचे निकाल 30 दिवसात लावण्याचे आदेशही राज्यापालांनी दिले आहेत.