मुंबई : वसईतल्या टॅबकॅब कंपनीच्या कारशेडला शनिवारी रात्री आठच्या सुमारास आग लागली. मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील मालजीपाडा-ससूनवघर परिसरात टॅबकॅब कंपनीचे कारशेड आहे. या कारशेडमध्ये 100 पेक्षा जास्त गाड्या आहेत. त्या जळाल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. रात्री चार तासांहून अधिक वेळ ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर रात्री 12 नंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले. पहाटे आग पूर्णपणे विझली होती. परंतु आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.