मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकाल घोळप्रकरणी काँग्रेसनं कुलगुरुंवर जोरदार हल्ला चढवला आहे. निकालाच्या घोळासाठी संघ विचारधाराचे कुलगुरुच जबाबदार असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच याची जबाबदारी घेऊन राज्यपालांसह शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि रवींद्र वायकर यांनी आपल्या पदावरुन पायउतार व्हावे, अशी मागणी केली आहे.


शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये कार्यक्षमता, अनुभव आणि पात्रता या महत्त्वाच्या गुणांऐवजी संघाशी संबंधित असणाऱ्या, संघ विचारधारा मानणाऱ्या लोकांना प्राधान्य दिल्यानेच, आज शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे विद्यापीठातील अनागोंदी कराभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्यपालांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

सावंत म्हणाले की, ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिक्षण क्षेत्राला वेठीस धरलं आहे. सरकारच्या मदतीने आपल्या विचारधारेचा प्रसार करण्याकरिता व संघ विचारधारेशी संबंधित लोकांची नियुक्ती वेगवेगळ्या पदांवरती करून, त्यांच्यामार्फत शिक्षण क्षेत्रात संघाची घुसखोरी सुरु आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंची नियुक्तीवेळी विद्यमान कुलगुरुंपेक्षा अधिक अनुभवी व कार्यक्षम उमेदवारांनी अर्ज केले होते. पण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये तीन वर्ष काम केल्याचा अनुभव आणि संघाशी संबंध हिच गुणवत्ता लक्षात घेऊन, विद्यमान कुलगुरुंची नियुक्ती करण्यात आली. असा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे.

त्यामुळे राज्यपालांनी तात्काळ कुलगुरु संजय देशमुख यांची हकालपट्टी करून, सुयोग्य व्यक्तीची कुलगुरूपदी नियुक्त करावी. तसेच या संपूर्ण अनागोंदी कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्यपालांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर या दोघांनीही या अकार्यक्षमतेची जबाबदारी स्वीकारून पायउतार व्हावे, अशी मागणी केली आहे.