मोहाली : रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजानं सातव्या विकेटसाठी रचलेल्या 67 धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे मोहाली कसोटी रंगतदार स्थितीत येऊन पोहोचली आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारतानं सहा बाद 271 धावांची मजल मारली असून पहिल्या डावात केवळ बारा धावांनी पिछाडीवर आहे.


दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रवीचंद्रन अश्विन 57 आणि रवींद्र जाडेजा 31 धावांवर खेळत होते. या सामन्यात चहापानापर्यंत टीम इंडिया दोन बाद 148 अशा सुस्थितीत होती. पण अदिल रशिदनं पुजारा आणि रहाणेचा काटा काढून टीम इंडियाला बॅकफूटवर धाडलं.

कसोटी पदार्पण करणारा करुण नायरही अवघ्या चार धावा करुन धावचीत झाला. त्यामुळे भारताची पाच बाद 156 अशी केविलवाणी अवस्था झाली. त्यानंतर विराट कोहलीनं आर. अश्विनच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचून भारताला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला.

विराट कोहली 62 धावांवर बाद झाला, त्यावेळी भारतानं सहा बाद 204 धावांची मजल मारली होती. पण अश्विननं जाडेजाच्या साथीनं 67 धावांची अभेद्य भागीदारी रचून टीम इंडियाल मोहाली कसोटीत कमबॅक करुन दिलं. त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव 283 धावांवर आटोपला होता.