मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र, हवामान खात्याने आता बळीराजाला दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे. येत्या तीन ते चार दिवसांनी पावसाच्या पुनरागमनाची शक्यता हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.


जूनमध्ये पाऊस चांगला बसरल्यानंतर गेल्या आठवड्यापासून पावसानं दडी मारली. मात्र, राज्यात मान्सून 12 जुलैनंतर पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

वातावरणातील बदल अनुकूल नसल्यानं पावसानं मोठी विश्रांती घेतली आहे. जून महिन्यात राज्यभर चांगल्या पावसाचं चित्र पाहायला मिळालं. पण गेल्या दोन दिवसांत कमाल 31 अंश आणि किमान 23 अंश तापमानाची नोंद झाली. आता येत्या 3 ते 4 दिवसांत राज्यात पाऊस सक्रीय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे पावसाच्या चिंतेत आणि दुबार पेरणीच्या संकटात पडलेल्या बळीराजाला पण दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.