Manoj Jarange Patil In Mumbai मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासह हजारोंच्या मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर आज आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, या आंदोलनासाठी 5 हजार लोकांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र आंदोलनापूर्वीच (Manoj Jarange Mumbai Morcha) मैदान हाउसफुल्ल झालं आहे. तर त्याहून कैकपट मराठा आंदोलक हे वाटेत आहे. त्यामुळे आंदोलन सुरु होण्यापूर्वीच गर्दीची लाट आज मुंबईत उसळल्याचे चित्र आहे. दरम्यान या गर्दीच्या नियोजनासाठी खास उपाय केला गेल्याचे समोर आलं आहे. राज्यभरातून जमलेल्या मराठा बांधवांची गर्दी लक्षात घेता सुरुवातीला 5 हजार लोक आतमध्ये येणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लोकांना सोडण्यात येणार असून आळीपाळीने लोकांना मैदानात सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आंदोलनस्थळ आझाद मैदानही हाऊसफुल्ल!
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक आज (29 ऑगस्ट) पहाटेपासून मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी ठीकठिकाणी मनोज जरांगेचं भव्य स्वागत करण्यात आलं. शेकडो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल (Manoj Jarange Mumbai Morcha) झालेत. दुसरीकडे प्रत्यक्ष आंदोलनस्थळ म्हणजे आझाद मैदानही हाऊसफुल्ल झालंय. मनोज जरांगेंनी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिलीये. त्यामुळे संध्याकाळी सहानंतर मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक काय भूमिका घेणार हे पहाणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.
फ्री वेवरून प्रवास टाळण्याच्या मुंबई वाहतूक पोलिसांकडून सूचना
दुसरीकडे, मराठा आंदोलनाचा फटका मुंबईच्या वाहतुकीला देखील बसला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फ्री वेवरून प्रवास टाळण्याच्या मुंबई वाहतूक पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या आहे. फ्री-वेवरून सध्या केवळ मराठा आंदोलनकर्त्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. आज मुंबईत मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता त्यानुसार नियोजन करण्याच्या मुंबई पोलिसांच्या सूचना असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
2. हैदराबाद गझेटियर लागू करा... 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.
4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या...अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या..., अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.