सोलापूर : आंतरजातीय प्रेमविवाहाच्या रागातून मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे एका सैनिकाच्या पित्याला गावात बांधून आणत झाडाला बांधून केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी पोलिसांनी व्हायरल झालेल्या क्लिप मधील १२ जणांवर आत्तापर्यंत गुन्हा दाखल केला आहे. अजूनही या क्लिपमधील संशयितांचा शोध सुरूच आहे. या घटनेत काल सकाळी 8 वाजता दामाजी बरकडे यांना त्यांच्या वस्तीवर जाऊन बेदम मारहाण करत हाताला बांधून 3 किलोमीटर धिंड काढीत गावात आणण्यात आले. यानंतर त्यांना गावात एका झाडाला बांधून पुन्हा गावकऱ्यांदेखत मारहाण करण्यात आली होती. यावेळी सगळे गाव समोर असूनही कोणीच त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र याची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने त्यांची सुटका केली.


यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यावर वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली आणि 10 आरोपीना तातडीने अटक करण्यात आली. यात गावातील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांसह मुलीच्या कुटुंबातील वडील, भाऊ, चुलते, चुलत भाऊ यांनाही मारहाण प्रकरणी पोलिसांनी अटक केली. आता या प्रकरणातील एक महिला व एक अल्पवयीन मुलाला अटक करायची राहिली आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमधून इतर आरोपीना शोधण्याची मोहीमही वेगाने सुरु झाली असून सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी गावात भेट देऊन तपासाची पाहणी केली.


सोलापुरात प्रेमविवाहाच्या रागातून मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण!


काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाळवणी गावातील या तरुणाचे गावातील दुसऱ्या जातीच्या मुलीवर प्रेम होते. दोघांनीही 4 ऑगस्ट रोजी पळून जाऊन लग्न केले व मंगळवेढा पोलीस ठाण्यात हजर झाले होते. यानंतर दोन्हीकडील कुटुंबीय पोलिसांसमोर एकत्र येत हे प्रकरण संपवले होते. तरीही या नवविवाहित दाम्पत्याला गावातच एका पाहुण्यांकडे ठेवण्यात आले होते. यानंतर हे दाम्पत्य 7 ऑगस्ट रोजी पुण्याला नोकरीसाठी निघून गेले आणि वादाला तोंड फुटले. मुलाच्या वडिलांनी मुलीकडील मोठ्या जावयाला फोन करून मुलाकडे लक्ष देण्याची विनंती बापाच्या मायेने केली. मात्र तू आमच्या जावयाला फोन का केला असा सवाल करत मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या वडिलांना अमानुष मारहाण करत हाताला बांधून गावात आणत पुन्हा झाडाला बांधून मारहाण केली. या प्रकरणामुळे बरकडे कुटुंब दहशतीखाली असून सैन्यदलात असणाऱ्या थोरल्या मुलाची पत्नी व तान्हे बाळ देखील घरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. आपल्या कुटुंबियांच्या जीविताला धोका असल्याचे मुलाची आई सांगत असून आमचा मुलगा सीमेवर रक्षण करतोय आमचे रक्षण पोलिसांनी करावे अशी मागणी त्या करत आहेत.